काही बाही

काल परवाच नवीन घरात शिफ्ट झालो. घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून असं म्हणतात. माझे दोन्ही झालेत. सिकंदराला माझ्यापेक्षा थोडा कमी आनंद झाला असेल कदाचित. सलग दोन दिवसाच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने आम्ही गृहप्रवेशाचा मुहूर्त ठरवला, ब्राम्हणाला दक्षिणा न देता, भूतांना जेऊ न घालता. तर सामान आवारावर चाललेली. वरच्या माळावर काही बॉक्स सापडलेत. मदतीला आलेल्या घरमालकांनी 'यात काय आहे?' असं सहजच विचारलं. तेव्हा मी थोडं गर्वानेच सांगितलं, 'यात माझी संपत्ती आहे' म्हणून. काय होती ती संपत्ती? कोणे एकेकाळी मला वाचनाची काय ती आवड होती. खरच होती कि मित्रांपुढे थोड्या पाठ केलेल्या वाक्यांनी फुशारक्या मारता येतात म्हणून वाचत होतो कोण जाणे. पण थोडं फार अगोदर वाचत होतो. मधल्या काळात सगळं बंद झालं. वर्षाकाठी एखादं दुसरं पुस्तक वाचण होतं होतं, पण आज काल तेही बंद झालंय. कधी कधी हुक्की येते आणि मी तीन चार पुस्तकं विकत घेऊन येतो, वर्षाकाठी. वाचण होतंच असं नाही. बऱ्याचदा नाहीच. एक वपू काळे आणि दुसरे खांडेकर सोडलेत तर बाकीचे मी कधी त्यांना वाचतोय, त्याचीच प्रतीक्षा करीत राहतात बिचारे.
            मी माझ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला द्यायच्या उत्तरांबद्दल चर्चा करतांना नेहमी एक विषय ठरलेला असतो. छंद. विद्यार्थी एकदम फार्मात सांगतात माझा छंद वाचन म्हणून, पण शेवटी वाचलेलं पुस्तक विचारलं कि गांगरतात. मग एखादा सांगतो शामची आई. वाचलं कधी? इयत्ता पाचवी नाहीतर सहावी. मधल्या काळात छंद खुंटीवर. मटण खाणारे काही महाभाग  माळ/जानवं टांगतात तसं. असं काहीतरी आपलं झालंय असं मला आतून वाटायला लागलं. बायकोने पसारा होऊ नये म्हणून पर्याय सुचवला 'आपण हा रचलेला बॉक्स तसाच राहू देऊ म्हणजे नव्या घरात सरळ माळ्यावर ठेवता येईल'. मी मनात थोडा निश्चय केला आणि काही न बोलता होकार भरला. काल विद्यापीठातून घरी आलो आणि घरात टी-२० क्रिकेट विश्वचषकाचा भारत-बांग्लादेश सामना चालू होता. बापाला क्रिकेट बघण्याचं वेड. आपली डाळ शिजणार नाही म्हणून मी सहज वर गेलो हाताला लागेल ते पुस्तक घेतलं वाचयला. पुस्तक होतं दया पवारांचं 'बलुतं'.
            मी हे पुस्तक का विकत घेतलं असेल? माहित नाही. असली पुस्तकं मला कधीच आवडली नाहीत. कारण माहित नाही पण परवा परवा गाजलेला 'फंड्री', 'कोर्ट', 'पान सिंग तोमर' आणि 'चक्रव्यूह', 'आरक्षण' यांसारखे चित्रपट पण तशाच पठडीतले. 'अरे, तुम्हारी टट्टीयां साफ की हमने' म्हणणारा सैफ अली कित्तेकदा मला त्या लोकांचं दु:ख दाखवत राहिला. विषय कदाचित वेगवेगळे असतील पण बाहेर पडताना मधमाश्यांचा पोळ्याला दगड मारल्यानंतर मधमाश्या मागे लागाव्या तसे असंख्य प्रश्न डोकं भंडावून सोडतात. ७८ साली प्रसिध्द झालेलं हे आत्मचरित्र आज तसं काल्पनिक वाटायला हरकत नव्हती पण समाजात फार फरक पडलाय असं आहे का? नाही. आजही माझ्या 'गावाबाहेर' महारवाडा आहे. गावातल्या मंडळीना पंगतीला बोलवण्यासाठी नाव्हीच दारोदार भटकतो. वर्षाकाठी त्या मोबदल्यात त्याला काहीतरी दिलं जातं म्हणे. वरच्या पदावर बसलेला खालच्या(?) जातीचा इतरांना कसा नको असतो, तो सुध्दा तुमच्या बापजाद्यांनी आम्हाला
छ्ळल म्हणून तो यांना छळतो. सगळंच दुष्टचक्र. मला समाज म्हणजे फक्त महार/दलित/नवबौध्दांच्या अशा लिमिटेड एडिशनबद्दल बोलायचं नाहीच आहे. आज असहिष्णुतेवर गप्पा मारणारे राजकारणी पाहिलं कि वाटतं, इतकी युग हि षंढ झोपली होती का? एखादी खैरलांजी, दादरी जळायलाच हवी का यांच्या पोळ्या शेकण्यासाठी? एखादा रोहित जायलाच हवा का? यांना आईचा पान्हा फुटण्यासाठी. माझ्या स्वयंघोषित महान अशा महाराष्ट्रात, गेल्या वर्षभरात, मागील पंधरा वर्षात सर्वात जास्त आत्महत्या झाल्यात म्हणे. १०००च्या आसपास राहिलेत म्हणून save tigers लिहावं लागतंय, मोहीम वगैरे चालवाव्या लागता आहेत. त्या क्षणाची वाट पाहणार आहोत का आपण ?  तुम्ही, मी काहीच करू शकत नाही का? एखादं दुसऱ्या नाना मकरंदनेच का खटपटी करायच्या? शरीरावर एखाद्या ठिकाणी, समजा अंगठ्याला जखम झाली तर फक्त अंगठा ती वेदना सहन करतो का? नाही, ती वेदना पूर्ण शरीराची होते. ओठ फुंकर घालतात. हात मलमपट्टी करतात. समाज एक शरीर असेल तर मी कुठे आहे? माथ्याशी कि पायथ्याशी. यापेक्षा जखम कुठे आहे? मी काय करू शकतोय? ते जास्त महत्वाच नाही का?
            मान्य आहे आपण सर्व कलियुगात जन्मलेले अश्वथामा आहोत. प्रत्येकाच्या भाळी वाहती जखम आहे. माझी जखम किती मोठी आणि तुझी किती, माझ्या समाजाची किती तुझ्या समाजाची किती? हा खेळ खेळण्यापेक्षा काहीतरी वेगळ व्हायलाच नकोय का? एक दुसऱ्याला आधार न देता, सारासार विचार न करता किती दिवस आपण त्याचं रूढी परंपरांच क्रूस वाहत जाणार आहोत. कदाचित माझ्या या कथनातून मी वाण्या बामणाचा वाटेल. पण मी माझ्या बापाचे शेतीतले हाल पाहतोय. तरी आज न उद्या छान उत्त्पन्न येईल आणि मी कर्जातुन मोकळा होईल या आशेवर बाप दरवर्षी कर्जात भर टाकतोय. माझ्या गावातले कित्येक तरुण गाव सोडून, शेती सोडून कामधंद्यासाठी जळगाव-पुण्यामुंबईत पळालेत. काहींनी दुधाच्या काहींनी पान सुपारीच्या टपऱ्या सुरु केल्यात. आज निमित्त पावसाचं असेल, कदाचित उद्या पिकाच्या भावाचं, परवा गारपिटीच. हनुमानाची शेपूटच जणु. शेतात कामधंदा नाही म्हणून व्यसनाकडे शेतकरी वळला आणि नंतर आत्महत्या केली, तर शहाणे बोलायला तयार व्यसनामुळे/मोबाईलच्या बिलामुळे गेला म्हणून. जिभेला हाड नसतं म्हणे पण म्हणून बोलण्यासाठी येणारे शब्द. ते तर बुद्धी पुरवतेना. का तिला हि पुरवली माती आड यांनी? मला आठवतंय चांगलं माडगूळकरांची(?) का कुणाची तरी 'बनगरवाडी' वाचलेली एक दहा वर्षापूर्वी. तेव्हाही असंच काही बाही विचार मला छळांयचेत. मी सहज सुट्टी निमित्त नाशिकला मामाकडे गेलो होतो एक दोन दिवसा करता. मी माझ्या मामींना ते पुस्तक देऊन सांगितलं आता मला हे पुस्तक वाचायची इच्छा नाही तुमच्या कडे असू देत. त्या मामांचे पण पुढे हालच झालेत. कोड असलेली बायको जबरदस्ती करून दिली म्हणून लग्नाच्या पंधरा वर्षानंतर हा अतीव दु:खात बुडाला आणि याने बाटलीला जवळ केलं आणि संसाराची राख रांगोळी केली. दु:खाची  वाटणी करतांना तो शिकलेला, अडाणी, गरीब, श्रीमंत, शेतकरी, नोकरदार असा भेदभाव थोडीच करतो. असो.
            विषय भरकटलाय कदाचित. मोठ्या मोठ्या गप्पा मारून उद्या मी सर्व विसरून जाणार. स्वत: मोठं पुण्य करतोय, समाजासाठी काही तरी करतोय या समाधानासाठी हजार दोन हजारची मदत 'नाम'ला पाठवेल आणि पुन्हा काही झालच नाही अशा अविर्भावात वावरेल, निगरगट्ट सारखा... नाहीतर 'शिवाजी कोण होता?' आणि 'शुद्र खरे कोण होते?' शोधेल, आणखी थोडं डोकं फिरवून घ्यायला.           मनोज

४ टिप्पण्या:

  1. मनोज छान मांडणी केलीये, वास्तव दाखवण्याचा पूरेपर प्रयत्न केलाय, मला वाटत की, वाचकांनी यातून नेमक कोणकोणता बोध घ्यावा हे त्यांनी स्वतः ठरवावं.

    उत्तर द्याहटवा