थोडासा स्पेस
अगदी काल परवाची गोष्ट आहे. कसल्याश्या विचारांनी
डोक्यात थैमान घातलेलं होतं. अशावेळी मनाला एकांत हवा असतो. प्रत्येक वेळी कुणाला
तरी काही सांगून, विचार थांबतात थोडीच. त्यांनाही कदाचित थोडी त्यांची स्वत:ची अशी स्पेस
हवी असते. आपण दुसर्या कुणाजवळ व्यक्त होण्या अगोदर स्वत:जवळ व्यक्त व्हावं,
विचाराचं अमृत मंथन वगैरे व्हावं, असं कदाचित त्यांनाही वाटत असावं. बऱ्याच वेळी
असं काही वाटायला लागलं की, आपण स्केअर फिटस् मध्ये स्पेस मोजून लाखो खर्चून,
घेतलेल्या घरात आपल्याला स्पेस मिळत नाही. मग आपण कुणा दुसऱ्याच्या मदतीने दाराला बाहेरून
कडी किंवा कुलूप लावतो आणि बसतो आपण
आपल्या ह्या उसन्या एकांतात. (मी असं बऱ्याच वेळेस
केलंय) तसं नाही जमलं तर आपण घरातून बाहेर पडतो. एकांत शोधतो. पण नेहमी तेही जमेलच
असं नाही. अशावेळी 'काय विचार करतोय?', 'काही टेन्शन आहे का?', 'आता मलापण नाही
सांगणार का?' सारख्या आपल्याच माणसांच्या प्रश्नांनी आपण वैतागतो. शब्दांवरूनच
तात्पुरता का होईना विश्वास उडलेला असल्यामुळे आपण उलटसुलट उत्तर देतो. प्रश्न
विचारणारा जरी आस्थेने चौकशी करत असला तरी त्याला तसल्या उत्तराचा राग येतो आणि तो
रागात निघून जातो. जाता जाता आपली लिंकतर तोडून जातोच पण नसलंच तर टेन्शन देऊन
जातो.
आपण लग्न करताना मुलीला तिची ध्येये
विचारावी, तिची मोठी ध्येयं बघुन आपण तिला पसंत करावी आणि लग्नानंतर नवऱ्याचं सुख
हेच तिनं तीचं मुख्य ध्येय करावं. 'मंगलाष्टक वन्स मोअर' मधल्या आरती(मुक्ता बर्वे)सारखी
नवऱ्यालाच आपलं जग मानणारी, सारखी मागेमागे करणारी पत्नी कुणालाही नकोच असणारे. आपल्या जवळच्या माणसाला
आपली काळजी वाटणं ठीक आहे पण आता माझं अंगणातल्या रोपावर प्रेम आहे. त्याची काळजी वाटते
म्हणून 'त्याला थोडंही ऊन लागु नये' असा मी विचार केला तर? आता मी एक मुलाचा बाप
म्हणून त्याची मला काळजी वाटणं साहजिकच आहे, पण गावातल्या रस्त्यांवर तो हरवू नये म्हणून
नेहमी मी त्याला ने-आण करीत राहिलो तर? प्रत्येकवेळी शर्टाचा रंग निवडताना निळा
अथवा पिवळाच कसा चांगला हे मी त्याला सांगू लागलो तर? प्रत्येक वेळी तो धडपडेल,
तेव्हा त्याला मीच सावरायला लागलो तर? 'मी कसे जास्त पावसाळे पाहीलेत' आणि 'मीच
कसा बरोबर आहे' असं ऐकवित राहिलो तर? दारातल्या रोपट्याची अवस्था होईल त्याची.
अस का होतं? नात्यांनी माणूस मुक्त होण्याऐवजी
जास्तच गुंतत जातो, गुरफटत जातो, कमळांच्या तलावात त्यांच्या देठांमध्ये गुरफटतो
तसा. मोकळं व्हावं म्हंटल तर नाती तुटत जातात, जे कुणालाही नकोच असत. मग ती नाती
रक्ताची असोत नाही तर भाव भावनांनी, स्नेहानी-प्रेमाने बनलेली का असेना. अचानक कुणी तरी
गळा दाबावा, पाण्याखाली डोकं दाबून ठेवावं, अन श्वासाने अस काहीतरी करून
अस्तित्वाची जाणीव करून द्यावी अस होत. आपलं ज्यावर
मनापासून प्रेम असेल न त्याला आपण कसं मुक्त विहरू द्यावं. बंधनं अशी असावीत की
त्यांना मानलं तरच त्यांनी त्याचं अस्तित्व दाखवावं, नाही तर आपलं अदृश्य असावं.
मुक्त म्हणजे स्वैराचारी मुभा नव्हे, पण कसलंच दडपण पण नाही, अस काही तरी.
गोठ्यातल्या गुरांना जसं दावणीला बांधून ठेवावं लागतं, तसं नसावं, किंवा ते पळून
जाऊ नये म्हणून बांधतात ते लोंढणं सुद्धा नसावं. मांजरीचं पिल्लू कुठल्याही कानाकोपऱ्यात
सोडलं तरी ते घरी परततच की.
म्हणून प्रत्येकाला मिळायला पाहिजे थोडा तरी
स्पेस.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाUr writings make us to think. Nice sir
उत्तर द्याहटवाधन्यवाद विश्वजित.
हटवा