गर्दी

गर्दीला शिव्या घालणं तसं आपल्याला नवीन नसतं, आपण त्या गर्दीचा एक भाग असलो तरी. लागोपाठ सुट्ट्या आल्या की रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निवांतपणा शोधण्यासाठी आपण बाहेर पडतो. नजीकचं प्रेक्षणीय स्थळ जायचं ठरवतो किंवा सुट्टी धार्मिक कारणासाठी असेल तर धार्मिक स्थळ. ठराविक अंतर पार करून अनंत अडचणींवर मात करत किंवा अंताक्षरी खेळत आपण तिथं पोहचतो. निसर्गाचा/भक्तीचा आस्वाद घ्यायचा विचार मनात असतो अन् आपल्यासारखेच विचार इतर सामान्यांचे असतात. मग सुरु होतो गर्दीचा खेळ. 
अशा वेळी आपल्याला राग येतो गर्दीचा.

कारणं शंभरावर असतात, भुशी डॅमवर किंवा धबधब्या खाली अंघोळ करावी म्हणुन धावपळ करून जावं आणि एंट्रीसाठीच स्वतःच्याच घामात अंघोळ करावी लागणं असो. नाहीतर आपण कास पठारावर निसर्गाचा आस्वाद घ्यायला निघावं. सुंदर पठार बघायला न मिळता गर्दीतल्या प्रेक्षणीय स्थळांतच 'नेत्र'सुख घेऊन परतावं लागणं असो.

देवाचं दर्शन घ्यायला 'चलो बुलावा आया' म्हणत आपण निघावं. कित्येक तास गर्दीत घरच्या लक्ष्मीची नजर चुकवून अन्य 'देवी'दर्शनाचा लाभ मिळावा आणि त्या गडबडीत खिशातली लक्ष्मी गहाळ/चोरी होणं. देवळातल्या रांगेत एक-एक दोन-दोन दिवस उभं राहावं लागणं. त्या उपर गाभाऱ्यातही निवांतात दर्शन न मिळता ब्राह्मण, पोलीस किंवा सेवक मानगुटीला धरून बाहेर काढतो. आपल्या आतल्या गाभाऱ्यातला देव जागरूक व्हावा ही अपेक्षा असते पण होतं भलतंच, धक्का देणाऱ्यातल्या देवाचा विचार न करता आपण शिव्या देत बाहेर पडतो. सगळा प्रवास, खर्च केलेला वेळ-पैसा क्षणात पाण्यात. कुंभमेळ्यातल्या प्रसाद वाटपातली चेंगराचेंगरीबद्दल सांगायलाच हवं का? पुण्य कमवायला जायचं आणि एखाद्याच्या नरडीवर पाय देऊन त्याला प्रसाद (प्रत्यक्ष साक्षात र्शन ते ही यमाचं?). तिकडं सैतानाला कंकर मारण्यासाठी जायचं आणि चेंगराचेंगरीत 'माणसं' मारून यायचं, सारं
अजबच. 
ते होऊ नये म्हणुन आम्ही सणासुदीला शक्यतो देवाला सुट्टी देतो. त्याला प्रत्यक्ष भेटायला न जाता त्याच्यासोबतच्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपची त्यालाच आठवण करवून देतो. मग तोही आम्हाला बुलावा वगैरे पाठवायच्या भानगडीत पडत नाही. तरीही भेटावं वाटलंच तर जळी-स्थळी असलेला तो, जिथे तितका 'जागृत' नसतो (हा एक मोठा जोक आहे त्यावर नंतर सविस्तर) तिथं आम्ही त्याच्या भेटीला जातो.
बरं, हे फक्त सुट्ट्यांपुरतं मर्यादीत असतं तर त्यांचं आपल्याला फारसं वाईट वाटलं नसतं. आपल्याला जायचं त्याच लोकलने-बसने इतरांना पण जायचं असतं, तेही त्याच वेळी. सगळ्यांच्या पोटापाण्यासाठी बाहेर पडण्याच्या वेळा सारख्याच. या वेळी शिव्या गर्दीपासून सुरु होतात व्हाया  रेल्वे ते केंद्र सरकार पर्यंत किंवा पार ट्रम्पपर्यंत. सर्दी झाली म्हणून दवाखान्यात जावं तर गर्दीमुळे आपला नंबर येईपर्यंत सर्दी सोबत डोकेदुखीं किंवा ताप येणं, कॉमन.
गर्दीचा काही लोकांना राग येत नसावा. जसे भुरटे चोर, व्यापारी, डॉक्टर, इ. दुसरे मोठे चोर राजकारणी,  ते तर भाडं वगैरे देऊन, नट नट्या बोलावुन पण गर्दी गोळा करतात. त्यां दोघांचं खरं प्रेम असेल गर्दीवर, पोटापाण्याचा प्रश्न आहे ना.
(भाऊंच्या उद्यानात उदघाटनावेळी गर्दी असेल म्हणुन गेलो नाही. काल बायको मुलासोबत गेलो आणि गर्दी बघुन आलेल्या ह्या विचारांच्या गर्दीला कोंडावं म्हणुन हा उपद्व्याप.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा