नसती शंका

तो डेथ बेड वर शेवटच्या घटका मोजत होता. म्हणायला तशी घरची, जवळची म्हणवणारी सर्वच त्याच्या आजुबाजुला होती. ती सर्व त्याला चौफेर घेरून उभी होती. कुणी पाय चेपत होतं, कुणी कपाळावर हात फिरवत होतं. कुणी मनगटाला हात लावुन नाडी बघत होतं. कुणी सलाईनची नळी कमी जास्त करत होतं. काहींनी रडके चेहरे हाताने लपवले होते. तर काहींनी बाहेर चक्क तिरडी बांधायला घेतली. मडकं, बोळवण सगळं आणायची तयारी चाललेली. इतकी घाई का? डॉक्टरांनी अगोदरच हात टेकलेत का? पण डॉक्टर, नर्स कुणीही का दिसत नाहीये इथं. असं का?
ते त्याच्या आजूबाजूला जे आहेत, ते खरच त्याच्या जवळचे की? ते असे त्याला घेरून उभे आहेत ते यमराजाला तो दिसु नये म्हणुन, की त्याला मारतांना कुणी बाहेरच्याने पाहु नये म्हणुन. कपाळावर, पायावर हातावर ठेवलेले हात काळजीने ठेवलेत की तो झटापट करू नये म्हणुन. ती सलाईन बंद तर करत नाहीयेत ना? पण त्याच तोंड तर उघडय ना, तो ओरडु तर शकतोच ना. मग त्याला यम किंवा आणखी कुणी मारत असताना तो ओरडला का नाही? 'मारू नका', 'काका, मला वाचवा' सारख्या गयावया/विनंत्याही नाही. हात पाय झटकनं नाही. रक्ताच्याच नात्यांनी रक्ताचा सडा पाडायचा ठरवल्यावर तो हतबल झाला असेल का? अर्जुनाने हातातली शस्त्र सोडलीत तशी त्यानेही सोडली असतील का? का धर्माचं ज्ञान देणाऱ्या कृष्णाच्या हातूनच मृत्यु येणार म्हणुन हा असा वागला असेल?
ह्या सर्वांत ती कुठं आहे? म्हणे साता जन्माची सोबतीण, मग आता कुठंय ती? का वाल्या कोळ्याच्या अर्धांगिनी सारखी ती ही उत्तरली असेल? देवा ब्राम्हणांसमोर घेतलेल्या आणाभाका ती इतक्या सहजासहजी विसरली असेल? तसं असेल तर हरकत नाही, कारण 'जगाचा व्याप व्यवहारावर चालतो'. पण ही सावित्रीची लेक तिच्या सत्यवानाच्या मारेकऱ्यांना सामील असेल तर? त्याउपर तीच सूत्रधार असेल तर?
माझ्या शंकांची उत्तरं कोण देणार? त्याचे आप्त, कृष्ण, यम की तो स्वतः? गुन्हेगारच कसली कबुली देणार. फक्त तोच सांगु शकतो. हो तोच. पण तो तर निघालाय लांबच्या प्रवासाला जिथं काहीही घेऊन जाता येत नाही, अगदी प्रश्नच काय पण उत्तरंही नाही. मग?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा